
दिनेशकुमार ऐतवडे
फोन: 9850652056
“घर उभं राहतं विटा-सिमेंटानं, पण ‘वाडा’ उभा राहतो नात्यांनी, संस्कृतीनं आणि आत्म्याच्या स्पंदनांनी…..”
समडोळी हे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील एक शांत, पण ऐतिहासिक अंगाने समृद्ध गाव. या गावात गेल्या काही वर्षांत एक घटना घडली आहे – जी केवळ वास्तुविशारद किंवा आर्किटेक्चरच्या नजरेत नव्हे, तर संस्कृतीप्रेमी आणि इतिहासप्रेमी माणसांच्या हृदयात ठसठशीत उमटणारी आहे. वग्यानी कुटुंबाने पुनर्रचित केलेला वाडा म्हणजे त्या गावाच्या स्मृतींचा ताजातवाना अविष्कार आहे.
एका बाजूला काळाच्या प्रवाहात विस्मरणात गेलेले वाडे, आणि दुसऱ्या बाजूला वग्यानी वाडा – जिथे इतिहास, परंपरा आणि आधुनिकता यांचं अनोखं संमेलन आहे.
वाडा नव्हे, तर ती एक जिवंत अनुभूती
बाळासाहेब वग्यानी यांनी केवळ जुना वाडा दुरुस्त केला नाही, तर जणू आपल्या वडिलोपार्जित इतिहासाला नवी ओळख दिली आहे. घराची भिंत, दरवाजे, खांब, ओटे – हे सारे एकेकाळी जेवढं भौतिक होतं, त्याहून अधिक ते आज भावनिक बनलं आहे.
आज या वाड्यात प्रवेश करताना, अंगावर रोमांच येतो. जणू एखाद्या मराठी चित्रपटाच्या कालखंडात आपण प्रवेश करतो आहोत, जिथे पायऱ्यांवर आजीच्या आठवणी, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यात लपलेली पिढ्यानपिढ्यांची कुजबुज हे सारे अनुभवाला मिळते.
वाडा म्हणजे नुसते दगड नाहीत, तर वंशपरंपरेचा गाभा! वाडा ही एक भौतिक रचना असली तरी तिच्या मागे दडलेली वंशपरंपरा, मान-सन्मान, आणि संस्कारांची शिदोरी – तीच या पुनर्रचनेचं खऱ्या अर्थानं वैभव आहे.

समडोळी गावात अनेक पिढ्या वग्यानी वाड्याच्या आठवणींना कवटाळून मोठ्या झाल्या. पूर्वी इथे दिवाळीच्या दिवशी साऱ्या नातवंडांचा मेळा लागत असे. लग्न, मुंज, बारसे, सत्कार सोहळे, भजन संध्या – यांचा केंद्रबिंदू हा वाडाच होता.
बाळासाहेब वग्यानी यांचं हे कार्य म्हणजे मातीशी असलेली बांधिलकी आणि परंपरेशी असलेली नाळ पुन्हा घट्ट करणं – हे आजच्या पिढीला सांगणारं एक जिवंत उदाहरण आहे.

सांस्कृतिक पर्यटनाची शक्यता….
वग्यानी वाडा आज समडोळी गावापुरता मर्यादित नाही. त्याचा ठसा संपूर्ण पंचक्रोशीत उमटत आहे.
सांस्कृतिक वारसा, ग्रामीण पर्यटन, आणि पारंपरिक वास्तुकलेच्या अभ्यासासाठी हा वाडा ‘Heritage Spot’ बनू शकतो.
शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांना इथं शिकवण्या घेता येतील – की “वारसा जपा, मातीशी नातं ठेवा!” याशिवाय चित्रपट, वेब सिरीज किंवा डॉक्युमेंटरीसाठी देखील हा वाडा एक सुंदर लोकेशन ठरू शकतो.
उद्या कोण पुढाकार घेईल? बाळासाहेब वग्यानी यांनी जो आदर्श ठेवला, त्यावर आता अनेकांनी विचार करावा लागेल.
आज बंगल्यांच्या स्पर्धेत “वाडा” हा शब्द जुना वाटतोय – पण खरंतर वाडा म्हणजे उभ्या महाराष्ट्राची ‘ओळख’ आहे.
जर प्रत्येक गावात एक वाडा जपला गेला, तर तो गावाच्या आत्म्याला साजेसं मंदिर ठरेल.
काळजाच्या गाभ्यातील ठेवा….
समडोळीतील वग्यानी वाडा म्हणजे केवळ इमारत नाही, ती एक भावना आहे – ज्यात गुंतलेली आहे पिढ्यानपिढ्यांची माया, सन्मान, आणि आठवणींनी भरलेला काळ.
दिनेशकुमार ऐतवडे हे पत्रकार आणि ‘राजकीय लाईव्ह’ चे संपादक व प्रकाशक आहेत.
हेही वाचा …..
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास
पक्षीनिरीक्षण: सह्याद्रीच्या उतरणीवरून…..
माझं शालेय जीवन: तासगाव आणि समडोळी
फादर जोसेफ बॅण्ड (लघुकथा)
TheyWon Online Magazine (English)
TheyWon Online Magazine (Hindi)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!