
विकास पासलकर
सामाजिक क्रांती
सध्याच्या काळात मराठा व बहुजन, ब्राम्हण समाजासह इतर सर्वच समाज घटक एका अतिशय नाजूक आणि परिवर्तनशील, अवघड वळणावर उभा आहे. विशेषतः पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यात घडणाऱ्या काही दुर्दैवी घटनांनी समाजाच्या विवेकाला हादरवून सोडलं आहे. हुंडा, कौटुंबिक दडपण आणि चुकीच्या सामाजिक अपेक्षांमुळे मुलींना आत्महत्येसारखा भयावह निर्णय घ्यावा लागणं ही केवळ खंतजनक नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिशाप ठरलेली गोष्ट आहे.
आपण कितीही प्रगतीची भाषा बोलत असलो, तरी जर आपल्या मुलींना जगायला योग्य वातावरण, आदर आणि स्वातंत्र्य मिळत नसेल, तर तो समाज कधीही खरा प्रगत मानला जाऊ शकत नाही. म्हणूनच आता विचार करण्याची वेळ नाही, कृती करण्याची वेळ आली आहे. समाजाने एकत्र येऊन अंतर्मुख होणे गरजेचे आहे, पण त्याहून अधिक गरजेचे आहे ठोस पावले उचलणे.
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनिष्ट प्रथा – ज्या बाईला दुय्यम मानतात, लग्नाच्या नावाखाली तिला खरेदीसारखी वागणूक देतात – त्यांना आता थांबवायला हवं. या रूढींना छेद देणं म्हणजे फक्त प्रथा मोडणं नाही, तर एका नव्या आणि सन्मानित समाजाची पायाभरणी करणं आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये समाज म्हणून अंतर्मुख होऊन विचार करण्याची आणि केवळ विचार न करता ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये एकोपा निर्माण होईल, अनिष्ट रूढी-परंपरांना छेद दिला जाईल, आणि समाजाचे प्रबोधन होईल. महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे, आणि पुणे जिल्ह्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. म्हणूनच या घटना ही एक जागृतीची चाहूल आहेत.
आपले ध्येय स्पष्ट आहे – पुढच्या काळात कोणत्याही मुलीला आत्महत्या करावी लागणार नाही, कोणत्याही आईवडिलांना आपल्या लेकीचा चेहरा शेवटचा पाहण्याची वेळ येणार नाही, आणि कोणत्याही लग्नात एकही मुलगी आपली किंमत हुंड्याने मोजणार नाही.
हुंडा म्हणजे प्रतिष्ठा नाही, तो अपमान आहे
हे लक्षात घेतलं पाहिजे की हुंडा म्हणजे प्रतिष्ठा नाही, तो अपमान आहे त्यामुळे हुंडा देणे व घेणे याला पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे. हुंडा देणे आणि घेणे हि एक अमानवीय व स्त्री चे शोषण करणारी प्रथा आहे. म्हणून हुंडा देणाऱ्या आणि घेणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपण मोठा गुन्हा करत आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यामुळे हुंडा दिलाहि जाऊ नये आणि घेतला हि जाऊ नये याची प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
हुंडा देणे घेण्यापेक्षा लग्नाचा खर्च अर्धा अर्धा म्हणजेच दोन्ही कुटुंबांनी समान खर्च करावा किंवा लग्नामध्ये दिले जाणारे सोने चांदी आहेर यापेक्षा त्यावर होणारा खर्च त्याची रक्कम मुलीच्या नावे बँकेत फिक्स डीपोझीट करून मुलीला आर्थिक रित्या सक्षम बनवावे. जेणे करून भविष्यात काही अडचणी आल्या तरी सुद्धा ती आर्थिक रित्या दुर्बल नसेल.
हुंड्याच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला थांबवायला हवंय. ते सहन करण म्हणजे अन्यायाला साथ देणे. त्याचा तीव्र विरोध करण्याची गरज आहे. हुंड्यावरून छळ होऊ द्यायचा नाही आणि सहनही करायचा नाही. हे मुलींच्या मनामध्ये बिबवणे काळाची गरज आहे.
हुंडा घेणाऱ्या घरांची सामाजिक बहिष्कृती. अशा घरांमध्ये लग्न करणे टाळावे. समाजाने त्या घरांबद्दल आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करावी.
लग्नासाठी मुलीचा परिवार “हुंडा नाही तर नाते नाही” या मानसिकतेपासून बाहेर यायला हवा, पण समाजालाही “हुंडा घेतल्यास सन्मान नाही” हे ठामपणे सांगावं लागेल.
समाजाने एक संकल्प करावा – “हुंडा नाही, शिक्षण द्या!”
सामाजिक क्रांती
लग्न सोहळा म्हणजे प्रदर्शन नाही
साधेपणा आणि शिस्त हीच खरी शान. कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी लोकांमध्ये लग्न पार पाडली पाहिजे. लग्न वेळेतच लावावीत आणि जे वेळेवर पोहोचू शकत नाही त्यांच्या सदिच्छा भेटी स्वीकाराव्यात. वेळेत लग्न लावली नाही, तर पाहुण्यांनी उठून गेल्यास राग मानू नये.
वेळेची, पैशाची आणि श्रमाची योग्य बचत. एकाच दिवशी साखरपुडा, लग्न आणि अन्य विधी करावेत, वेगवेगळ्या दिवशी कार्यक्रम घेऊन खर्च आणि वेळेचा अपव्यय करू नये. फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांना समज देण्यात यावी, यांच्यामुळे वेळ होणार नाही यासाठी नियोजन करण्यात यावें.
लग्नात नाहक खर्च करू नये, जेवणामध्ये मोजकेच पदार्थ करावेत. जास्त पदार्थ टाळावेत. लग्नात अन्न शिल्लक राहिल्यास गरजू आश्रमात वगैरे देण्यात यावे.
लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळून, मुलगा व मुलगी कसे आनंदाने आणि समजूतदारपणे एकत्र राहू शकतील याचा गांभीर्याने विचार करावा.
लग्नानंतर होणाऱ्या विविध कार्यावर खर्च टाळावा. बाळंतपणाचा खर्च मुलीच्या वडिलांना करायला लावण्या ऐवजी स्वतः मुलाने करावा.
आयुष्यभर तडजोड कशाला?
एकदा लग्न झालं म्हणजे आयुष्यभर तडजोड करत रहायची. हि मानसिकता बदलण्याची गरज आहे. जर हुंड्यावरून मुलीचा छळ होत असेल आणि हे मुलीच्या जीवावर बेतत असेल तर विनाकारण तिला सासरी नांदवायची नाही. अश्या मुलीच्या पाठीशी तिच्या आई वडिलांनी आणि समाजाने उभे राहिले पाहिजे. कारण जिथे नाती जीवघेणी ठरत आहे. तिथे जबरदस्तीने तिला सासरचा रस्ता दाखवणे म्हणजे परत तिचा शापित प्रवास सुरु करणे होय.
मुलींसाठी ‘हक्क व मार्गदर्शन केंद्रे’ स्थापन करावीत. जिथे मुलींना लग्नानंतर त्रास होत असेल, तिथे त्या बिनधास्तपणे तक्रार करू शकतील अशा स्थानिक समित्या आणि तक्रार कक्ष असावेत. या केंद्रात कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तात्काळ संरक्षण उपलब्ध असावे.
गावा गावात समिती नेमून असे काही अत्याचार आणि चुकीचे काही घडत असेल तर त्या माध्यमातून उपाय करावेत .मध्यस्थी करून वाईट प्रकार रोखावे.
माणूस मोठा कि मंच याचा विचार व्हायला पाहिजे. मान्यवरांची नावे घेणे, मान्यवरांनी स्टेजवर गर्दी करण्याचे टाळावे. नेत्यांच्या मानपानात वेळ वाया घालवू नये. नेत्यांनी शक्य असेल तर स्टेजवर जाऊ नये, सत्कार घेऊ नयेत. तसेच जावई मानपान अगोदर मानाने उरकून घ्यावेत. त्यात वेळ घालवू नये.
सामाजिक क्रांती : ‘सहमतीचे विवाह’ या संकल्पनेला चालना द्यावी
आईवडीलांनी मुला-मुलीच्या पसंतीचा आदर करावा. बळजबरीने लावलेली नाती मुलींच्या आणि मुलांच्याही मानसिक आरोग्याला घातक ठरू शकतात.
योग्य वय, योग्य समज आणि दोघांची स्वेच्छा ही विवाहाची खरी पूर्वअट असावी.
सर्वात महत्त्वाचे लग्न ठरण्यापूर्वी एक वेळ पत्रिका नाहीं पाहिली तरी चालेल पण मुलांचे शारीरिक आरोग्य तपासणी करूनच लग्ने ठरवावीत.
मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. मुलींचे शिक्षण म्हणजे फक्त प्रमाणपत्र नव्हे, तर तिच्या आत्मविश्वासाचा पाया आहे. हुंडा देण्यापेक्षा मुलीला उच्च शिक्षण देणे हेच तिचे सर्वात मोठं ‘स्टेटस’ ठरेल.
स्त्री-पुरुष समानतेची शिकवण लहानपणापासून द्यावी. मुलांना लहानपणापासूनच “तुला बहिणीसारखी वागवायचं नाही, तिला व्यक्ती म्हणून सन्मान द्यायचा आहे” हे शिकवायला हवे.
घरातील कामांमध्ये समान सहभाग, निर्णय प्रक्रियेत स्त्रीची भूमिका याचे भान पिढीला लहान वयातच द्यावे.

सामाजिक क्रांती
मिरवणुका आणि त्यामुळे होणारी गर्दी टाळावी. आपल्यामुळे ट्रॅफिक जॅम होणार नाही याची काळजी घ्यावी.
प्री व्हिडिओ शूटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जाणार वेळ वाचवावा. त्याची गरज आहे का यावर सर्वांनी खरच विचार व्हावा.
लग्नात काय दिले,काय नाही याची चर्चा लग्नात करू नये. सोने,चांदी,आहेर यांचा उल्लेख टाळावेत.
सामाजिक क्रांती: सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आदीवर #NoDowryMarriage, #SimpleWedding, #GirlsDeserveRespect असे हॅशटॅग वापरून जागृती करावी.
प्रत्येक विवाहानंतर त्यातील सादगी, समानता, आणि हुंडा-विरहित नोंदी सोशल मीडियावर सामायिक करून इतरांना प्रेरणा द्यावी.
आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा- जोडप्याचा समाजाने गौरव करावा त्यांचे कौतुक करावे. त्यांना प्रोत्साहन द्यावे. अश्या प्रकारच्या प्रोत्सहानाने आदर्श विवाह प्रथेला चालना मिळेल. ‘आदर्श विवाह सप्ताह’ राबवावा
जिल्हा स्तरावर किंवा गावोगावी “आदर्श विवाह सप्ताह” साजरा करून, समाजात आदर्श उदाहरणं मांडावीत.
अशा विवाहांमध्ये सामील झालेल्या कुटुंबांना सन्मानपत्र आणि शासकीय लाभ द्यावेत.
शाळा-महाविद्यालयांमध्ये जागृतीपर उपक्रम घ्यावेत. युवकांमध्येच जर जाणीव निर्माण झाली, तर उद्याच्या समाजात बदल होणार हे निश्चित.
निबंध स्पर्धा, पोस्टर मेकिंग, नाटिका, शपथ विधी या माध्यमातून मुलांना आणि त्यांच्या पालकांना याबद्दल जागरूक करता येईल.
अशा प्रकारचे लहानसहान सकारात्मक बदल केल्याने समाजात चांगला संदेश पोहोचतो आणि एक सुसंस्कृत व सुदृढ समाज घडण्यास मदत होते. जिथे संधी मिळेल तिथे अशा विषयांना प्राधान्य द्यावे. अशा ठरावांचे फलक गावात लावून लोकांमध्ये जागृती करावी. चुकीच्या प्रथांना विरोध करणे आणि चांगल्या प्रथांचे स्वागत करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
या सर्व बाबींचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. शेवटी, प्रत्येकाने आपल्या लग्नात योग्य निर्णय घेतला, तर समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडेल…….
विकास पासलकर (पुणे) हे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि उद्योजक आहेत.
हेही वाचा:
लघुकथा | सुदीपच्या लग्नाचा प्लॅन
TheyWon Online Magazine (English)
TheyWon Online Magazine (Hindi)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!