डॉ. तानाजी शिवाजी बांगर
ऐतिहासिक दुर्ग भ्रमंती करण्यासाठी मेडिफिट फाऊंडेशनने यावेळेस दख्खन पठारावरील आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणारा, छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी, समुद्रसपाटीपासून जवळपास ८५० मीटर उंचीवर असलेला किल्ले रायगड प्रदक्षिणा करण्याचा मानस केला आणि त्याची तयारी सुरू झाली.
पौर्णीमेच्या रात्री ३० दूर्गवेडी, बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक मंडळी अतिशय उत्साहाने शनिवारी रात्री ११ वाजता २ टेम्पो ट्रावेलर्सने किल्ले रायगडाकडे रवाना झाली. पहाटे ३ च्या सुमारास ताम्हिणी घाटामार्गे गड पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी वाडीत मुक्कामी पोहोचलो. २ ते ३ तासाच्या विश्रांतीनंतर नव्या जोमाने मोहिमेसाठी सज्ज झालो. सकाळी चहापाणी आणि चविष्ट मराठमोळा पोह्याचा नास्त्यावर ताव मारून दुपारच्या जेवणासाठी पौष्टिक पोळी आणि मटकीची उसळ भाजीची शिदोरी बांधून घेतली. रायगडाच्या पायथ्याला ‘मेडीफीट ‘ बॅनर सोबत एक सामाईक फोटो घेत आणि ‘जय भवानी; जय शिवाजी ‘ च्या घोषणा देत परिक्रमेसाठी रवाना झालो.

चालताना सुरुवातीला उजव्या हाताला असणारा हिरकणी बुरुज जो रात्री गडाचे दरवाजे बंद झाल्यावर शुर गवळण हिरकणीने पोटच्या गोळ्याच्या प्रेमाखातर अंधारात उतरून अजरामर केला त्याला नतमस्तक होत चाललो होतो. सुरुवातीला काही अंतर डांबरी रस्त्याने चालल्यावर एका छोट्याश्या खिंडीत जिथे किल्ल्यावर पायी जाण्यासाठी चित्त दरवाजा होता तिथे आलो.बाजूलाच असलेली आणि खडकात दोन डोळ्या सारखी गोलाकार असणारी वाघबीळ मध्ये सर्वांना छायाचित्रण करण्याचा मोह आवरता आला नाही.
तिथून आम्ही नंतर पुढे विशाल असा नाणे दरवाजा बघून कच्च्या पायवाटेने धनगरवाड्याकडे रवाना झालो. रंगीबेरंगी फुले आणि वृक्षवल्लीवैविध्य अनुभवत आम्ही पुढे जोमाने जात होतो वाटेत असणारी फणस आणि औदंबरची झाडे तोंडाला पाणी आणत होती. लाकडाच्या मचानावर उभ्या भाताच्या गंजी दिमाखाने आमच्याकडे बघत होत्या. वाडीतून २ कुत्रे आम्हाला योग्य दिशेने मार्गक्रमण करण्याचे काम चोखपणे बजावत होते. मागेपुढे शेपटीचा गोंडा घोळत इमानदारीने आम्हाला मैत्रीपूर्ण साथ देत होते. थोडेसे पुढे गेल्यावर आम्हाला मोहिमेचे मार्गदर्शक श्री. दिलीप यांनी किल्ल्यावर असणारा टकमक कडा आणि त्याच्या पायथ्याला असणारा रायमाक स्मृतीस्थळ दाखवून त्याची माहिती सांगितली.
आत्ता विरळ असणारी झाडी गर्द आणि दाट होत होती.जंगल घनदाट झाले होते. सूर्यकिरणांच्या प्रकाश जमिनीवर पडायला संकोचत होता.त्याचबरोबर सरळ पायवाटेने आत्ता चढणाचे स्वरूप धारण केले होते. सोपी पदभ्रमण वाटणारी वाट आत्ता दुर्गचढाई वाटू लागली होती. नागमोडी वळणे आणि चढाई आत्ता फुफुस आणि हृदयाचा कस पाहत होती.श्वास थोडे चालल्यावर फुलत होता आणि विश्रांतीची विनवणी करत होता. साळुंखी पक्ष्यांचा चिवचिवाट आणि पानांचा सळसळाट हृदयाची स्पंदने वाढवत होता.पण या सर्वात सुखावणारी गोष्ट म्हणजे पिवळ्या रंगाचे दिशादर्शक बाण अचूकपणे पायाकडून मार्गाक्रमन करून घेत होते.

जवळपास ११ वाजता आम्ही गडाच्या वाघोली खिंडीमध्ये पोहोचलो.घामाघूम झालो होतो तरी उत्साह अथांग होता.आम्ही ४ ते ५ हौसे नऊसे खिंडीतून किल्ल्याकडे असणाऱ्या भवानी कड्याच्या बाजूकडे जाण्यास मार्गस्थ झालो. ५ ते १० मिनिटांनी वरतून दिसणारे विहंगम दृश्य आमच्या डोळ्याला आणि मनाला सुखावून गेले. काळ नदीचे विशाल पात्र,सिंगापूर नाळ,लिंगणा पीक, आदराई जंगल आदी गोष्टी मोबाइलच्या कॅमेरात कैद केल्या आणि खाली उतरत ७० ते ८० कोनाच्या उताराने गवत आणि झुडपाच्या बुंध्याचा आधार घेत परत खिंडीत आलो.
आत्ता आम्ही किल्ल्याची निम्मी प्रदक्षिणा जवळपास पूर्णे केली होती आणि किल्ल्याची दक्षिण बाजूकडे उतरण्यासाठी मार्गस्थ झालो होतो. कडक ऊन अंगातून पाणी पाणी काढत होते आणि तीव्र उतार आणि घसरडी पायवाट पायाचे सगळे सांधे आणि लिगामेंटची परीक्षा घेत होता.बऱ्याच वेळेस मागील बाजूने लोटांगण घातल्याशिवाय पुढे मार्गस्थ होता येत नव्हते. उन्हाने अंगाची ल्हाई ल्हाई होत होती. घामाने अंघोळ झाली होती. घसा कोरडा पडत होता. कोणत्याही ट्रेकिंगसाठी पाणी किती अत्यावश्यक आहे आणि याला जीवन का म्हणतात हे पदोपदी जाणवत होते. सुरूवातीचा उत्साह काही अंशी विसावला होता.प ण पुढे जाऊन जेवायचे आहे या आशेवर चालत होतो. खाली आल्यानंतर सर्वांनी पाणी आणि जेवणावर ताव मारला. प्रत्येक अन्नाचा घास आणि पाण्याचा घोट चविष्ट होता.श्रम केल्यावर जेवणाची चव आज कळली होती. टेस्ट बड्स मनाला उसळीचा आनंद देत होत्या. औटघटकेचे विश्रांतीनंतर हात पाय आत्ता सुखावू लागले होते पण वाडीत तर पोहोचायचे होते. एका तासlमध्ये पोहोचू अशी आशा फोल ठरत होती.

वाटेत गडाचा वाघ दरवाजा आणि काळकाई खिंड बघून पुढे जात होतो चढ उतार येत जात होते पण रस्ता संपत नव्हता.जीवनाच्या प्रवासाशी साधर्म्य असणारा हा प्रवास करत पुढे जात होतो शरीर थकलं तरी मन तणावमुक्त आणि हलके झाले होते.अलगदपणे आणि नकळत डोळ्याच्या पापण्या एकमेकाला आलिंगन देऊ लागल्या होत्या
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक गाडी वाट दिसू लागली आणि गावातून गडावर जोडलेला रोपवे नजरेस पडला. गावाजवळ आल्याचा आनंद झाला.मोहीम सुखरूप पूर्ण केल्याचा आनंद झाला. वेळेअभावी गडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागला पण परत नक्की येऊन समाधी दर्शन घेण्याचा निश्चय त्याचवेळी केला.परतीच्या वाटेवर पाचाड येथे असणारी जिजाऊ मासहेबांची समाधीचे दर्शन घेऊन निघालो.किल्ल्याच्या वाटेवर आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी पाचाड येथे वास्तव असणारा राजमाता जिजाऊंचा राजवाडा याची तर प्रचिती देत होता. धन्य ती माता जिने या मराठ्यांच्या स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न दिल…!
परतीच्या वाटेवर मनात असंख्य विचारांचे चक्र सुरू झाले .आपण जगत असलेले शहरी, कंफर्ट जीवन शैली आणि आपल्या पूर्वजांनी,छत्रपतींच्या मावळ्यांनी या कड्यकपारीत, गड खिंडीत केलेला शत्रूचा सामना,संघर्ष….!
९० च्या कोनामधे अथकपणे उभे असणारे सह्याद्रीचे पोलादी सुळके,आणि कड्यकपारी महाराजांच्या पराक्रम आणि शौर्यांची साक्ष देत होते.आजच्या २१ व्या शतकात,तंत्रज्ञानाच्या युगात देखील एखाद्या स्थापत्य शास्त्राला चपराक मारेल असे मजबूत आणि कोरीव गडाचे बांधकाम डोळ्याला दिपवून टाकणारे आहे. कडक ऊन, सूसाट्याच्या वारा, धो धो पाऊस,असंख्य वादळे आणि परकीय शत्रुची आक्रमणे या सह्याद्रीने आणि रायगडाने किती सहजपणे परंतु ताकदीने परतून लावली आहेत याची प्रचिती देत आहेत.अखंडपणे , आहोरात्र डोळ्यात तेल घालून फितुरी आणि आक्रमणापासून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या या राजधानीचा अभिमान वाटतो. म्हणूनच या चार ओळी नकळत ओठातून बाहेर पडतात,
केली खुशाल माझी, शिकार या पारध्यानी* , *रक्तबंबाळ झालो तरी पंख मी टाकणार नाही
*वणव्यातून चालताना संतप्त देह झाला,
चिवट पोलाद असे मी मोडेन पण वाकणार नाही…!
माझा सलाम या मर्द मराठा मावळ्यांना आणि मानाचा मुजरा छत्रपतींच्या अफाट कर्तृत्वाला……!

![]() | डॉ. तानाजी बांगर हे जनरल फिजिशियन आहेत आणि चिंचवड येथे प्रॅक्टिस करतात. त्यांचे आरोग्यविषयक व्हिडिओजही आहेत, जे तुम्ही https://bit.ly/47dikLP इथे अवश्य पहावेत. |