धर्मांतर: वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर……..

धर्मांतर

महावीर सांगलीकर

महान लोक संघटित धर्मांपासून मुक्तच राहतात. त्यांना एखाद्या धार्मिक टोळीत सामील व्हायची गरज नसते. त्यांना देवळात, मशिदीत, दर्ग्यात, चर्चमध्ये हजेरी लावण्याची गरज नसते. आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना धर्माचा आणि देवाचा सहारा घेण्याची गरज नसते. अशा महान लोकांच्यामधूनच शास्त्रज्ञ, संशोधक, तत्वज्ञ, जग बदलवणारे उद्योगपती बनतात. तुम्हाला महान बनायचं असेल तर तुम्ही महान लोकांचा हाच मार्ग स्वीकारायला पाहिजे.

अर्थात अशा महान लोकांमध्येही काही लोक थोड्या प्रमाणावर धार्मिक असू शकतात, पण तो त्यांच्या जीवनाचा मुख्य भाग असू शकत नाही.

वास्तविक पहाता धर्माच्या आहारी जाणारे लोक मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजातील असतात. काही धूर्त राजकारणी आपल्या फायद्यासाठी या समूहांचा वापर करून घेतात.

असे असले तरी या वर्गातील विचार करणाऱ्या अनेक लोकांना आपल्या धर्माचा, त्यातील फोलपणाचा राग आलेला असतो. त्यामुळे ते आपल्या धर्मापासून दूर गेलेले असतात. यातील काही लोकांच्या मनात धर्मांतर करण्याचा विचारही येत असतो. काहीजण धर्मांतर करतातही.

काही ठिकाणी सामूहिक धर्मांतरही होत असते. हे प्रामुख्याने त्या लोकांवर त्यांच्या धर्माच्या ठेकेदारांकडून होणाऱ्या अन्यायामुळे होत असते. अशा प्रकारच्या धर्मांतरामागे समाजकारण आणि राजकारणही असते. काही सामूहिक धर्मांतरांमागे भौतिक आणि पारलौकिक फायद्यांचे आमिषही असते.

धर्मांतर ही गरज आहे का?

धर्मांतर ही काही वाईट गोष्ट नाही. काही लोकांसाठी धर्मांतर ही गरज असू शकते. पण माझा सामूहिक धर्मांतर या प्रकारास पूर्ण विरोध आहे. सामुहिक धर्मांतर हे केवळ समाजकारण आणि राजकारण असते. त्यामागे सूडभावनाही असू शकते. त्यामुळेच सामुहिक धर्मांतर करणारे लोक ‘धार्मिक’ झाल्याचे दिसून येत नाही.

धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तसेच आपण केवळ एखाद्या समाजात जन्मलो म्हणून त्या समाजाचा धर्म आपणास चिकटवून घेणे हे चुकीचे आहे. खरं म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याची मुभा पाहिजे. ज्यानं-त्यानं आपल्याला आवडेल, पटेल तो धर्म स्वीकारावा. हा स्वीकारलेला धर्म कसा चांगला आहे हे इतरांना सांगत बसण्याचा प्रकार अजिबात करू नये. इतर धर्म कसे चुकीचे आहेत हे सांगत बसणे म्हणजे मूर्खपणाच आहे. आपल्याला आवडलेल्या धर्माचे आपल्या कुवतीनुसार पालन करणे हीच गोष्ट महत्वाची आहे. खरी धार्मिकता आपल्या धर्माचे पालन करणे आणि इतर धर्मांविषयी आदर बाळगणे यातच आहे.

धर्मांतर हे आर्थिक अथवा भौतिक आमिषामुळे, तसेच एखाद्या धर्माच्या द्वेषातून करणे हेही चुकीचे आहे.

बहुधार्मिकता

धर्मांतर

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एकापेक्षा अधिक भाषा बोलू शकतो, म्हणजे बहुभाषिक असतो, त्याच धर्तीवर आपण ‘बहुधार्मिक’ असायला काय हरकत आहे? म्हणजे जसं एखादा माणूस मराठी बोलतो, हिंदीही बोलतो आणि इंग्रजीही बोलतो, तसं एखाद्या व्यक्तीचा धर्म हिंदूही आहे, मुस्लिमही आहे आणि ख्रिस्तीही आहे असं व्हायला काय हरकत आहे? याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने रोज मंदिरात, मशिदीत आणि चर्चमध्ये जायला पाहिजे. धार्मिक असण्यासाठी तुम्ही प्रार्थना स्थळाला भेट द्यायलाच पाहिजे असे कांही नाही.

खरं म्हणजे आपण आपल्यावर इतर धर्मांचाही, इतर संस्कृतींचा मोठा प्रभाव असतो, पण प्रभाव आहे असं आपण मान्य करत नाही …. उदा. हिंदू लोक ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मात असणाऱ्या अनेक गोष्टींचं पालन करतात, भारतीय मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांवर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. वैदिक धर्मावर शैव आणि जैन या दोन्ही धर्मांचा मोठा प्रभाव आहे. कोणताही धर्म इतर धर्मांच्या प्रभावापासून मुक्त नाही.

आज तुम्ही ज्या धर्माचे अनुयायी आहात, तुमचे पूर्वज त्याच धर्माचे अनुयायी होते असे म्हणणे चुकीचे आहे. भारतातील बहुतांश मुस्लिमांचे आणि ख्रिस्ती लोकांचे पूर्वज हिंदू होते, आजच्या अनेक हिंदूंचे पूर्वज जैन अथवा बौद्ध होते, अनेक जैन समूहांचे पूर्वज हिंदू राजपूत होते, नवबौद्धांचे पूर्वज हिंदू होते, शैवांचे पूर्वज वैष्णव होते, वैष्णवांचे पूर्वज शैव होते …. भारतात याप्रकारे वैयक्तिक किंवा सामूहिक धर्मांतरे मोठ्या प्रमाणावर होत राहिली आहेत. एकाच घरात एक भाऊ शैव तर दुसरा वैष्णव, एक भाऊ शैव किंवा वैष्णव आणि एक भाऊ जैन, राजा शैव तर राणी जैन असे प्रकार मध्ययुगापर्यंत मोठ्या प्रमाणावर होते.

धर्मांतर करायचेच असेल तर ….

कोणताही धर्म स्वीकारायचा असेल तर आपण पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

  • जो धर्म तुमच्यावर अन्याय झाल्याने अथवा आवडत नाही म्हणून सोडला आहे, त्याचा द्वेष करू नये, त्याच्यावर टीका करत बसू नये. नाहीतर तुम्ही सोडलेल्या धर्मात विरोधक म्हणून का होईना अडकून बसाल.
  • तुम्ही जो नवीन धर्म स्वीकारला आहे, त्या धर्माच्या तत्वज्ञानाची अधिकृत माहिती देणा-या पुस्तकांचे वाचन करावे, व्हिडीओ पाहावेत.
  • त्या धर्माच्या आचरण विषयक नियमांचे पालन शक्य तितके पालन करावे. पण याबाबतीत स्वतःचा विवेक वापरावा.
  • धर्म हा प्रार्थना स्थळ आणि कर्मकांड यात नसतो हे जाणून घ्यावा व त्या गोष्टींपासून दूर रहावे.
  • पुरोहित, मध्यस्थ, धर्माचे ठेकेदार यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहावे.
  • धर्मग्रंथात लिहिलेले सर्व काही खरे असते असे अजिबात मानू नये. धर्मगुरू सांगतात तेही सर्व खरे असते असे मानू नये. स्वतःची प्रज्ञा वापरावी, बुद्धीच्या कसोटीवर गोष्टी तपासून पहाव्यात.
  • आपली वेशभूषा वगैरे गोष्टीतून आपण अमुक धर्माचे आहोत याचं प्रदर्शन करू नये.
  • त्या धर्माच्या संघटित आणि कट्टरतावादी टोळीत सामील होऊ नये.
  • धर्म म्हणजे सर्व काही नव्हे. तुमच्या जीवनात धर्माचे आणि धर्मगुरूंचे स्थान तेवढेच असावे, जेवढे तुमच्या जीवनात मीठाचे स्थान असते.

वर म्हंटल्याप्रमाणे धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तरी देखील संघटीत धर्म, अर्थात त्या धर्माचे अनुयायी कांही चांगले काम करत असतील (शैक्षणिक, आरोग्य विषयक, सेवा, सामाजिक कामे वगैरे) तर त्यात तन-मन-धनाने सहभाग घ्यायला पाहिजे.

कोणता धर्म स्वीकारावा….

आता प्रश्न असा पडेल की कोणता धर्म स्वीकारावा?
इथे तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही धर्मासाठी नसून धर्म तुमच्यासाठी आहे. त्यामुळे जो धर्म स्वीकारल्याने तुमची वैचारिक आणि भौतिक उन्नती होऊ शकेल असा कोणताही धर्म तुम्ही स्वीकारायला हरकत नाही. त्यासाठी आधी तुम्ही सर्व प्रमुख धर्मांचा तौलनिक अभ्यास केला पाहिजे, आणि त्याचबरोबर त्या-त्या धर्माचे अनुयायी कशा प्रकारचे जीवन जगत आहेत, त्यांचे समाजाच्या आणि देशाच्या विकासात काय योगदान आहे, त्यांचे इतर धर्मांच्या बाबतीत काय विचार आहेत, ते सर्वसमावेशक आहेत का अशा अनेक गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही ठरवायला पाहिजे की आपण कोणता धर्म स्वीकारायचा.

कांही लोक म्हणतील की धर्माची गरजच काय? तर याचे उत्तर असे आहे की ज्यांना धर्माची गरज नाही त्यांनी कोणताच धर्म स्वीकारू नये, पण ज्यांना धर्माची गरज आहे, त्यांना अडवण्याचा ‘अधार्मिकांना’ कसलाच अधिकार नाही. (त्याचप्रमाणे धार्मिक लोकांनाही धर्म न पाळणाऱ्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार नाही).

हेही वाचा:

नव्या सामाजिक क्रांतीची गरज – आता विचार नव्हे, कृती हवी!

फादर जोसेफ बॅण्ड

बौद्ध धर्मातील ब्राम्हण

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

ईश्वर आहे कि नाही? 

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *